
नाशिक :- मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस चिघळत असून राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहेत. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्णय घेतला जात आहे. नाशिकमध्ये देखील सकल मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत असून अवघ्या काही दिवसांवर आलेल्या दिवाळी सण हा न साजरा करण्याचा निर्णय सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने घेण्यात आला आहे.
नाशिकच्या शिवतीर्थावर सुरू असलेल्या मराठा मराठा समाजाची बैठक झाली. या बैठकीत विविध क्षेत्रातील, समुदायातील मंडळी उपस्थित होती. यावेळी सर्वाभिमुख ठराव घेण्यात आले. त्यात प्रामुख्याने मराठा समाजाचा आधारस्तंभ मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बघता व मराठा समाज शिक्षण आणि रोजगारातील आरक्षणासाठी झगडत असतांना नाशिक शहर व जिल्ह्यात एक ही घरात दिवाळी साजरा होणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे.
त्याचबरोबर मराठा समाजातील युवकांनी, शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये. तसेच राज्यात सुरु असलेल्या कुठल्याही हिंसक आंदोलनास सकल मराठा समाजाचे समर्थन नाही. मंत्री, आमदार, खासदार यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी, संसद, विधिमंडळात आवाज उठवावा, असे आवाहन मराठा बांधवांकडून करण्यात आले आहे.
गेल्या 50 दिवसापासून नाशिकच्या शिवतीर्थावर सकल मराठा समाजाचे साखळी उपोषण सुरू आहे. पूर्णवेळ उपोषणकर्ते नाना बच्छाव यांनी गेल्या 4 दिवसापासून आमरण उपोषणात बसले आहेत. याच ठिकाणी मराठा समाजाची बैठक घेण्यात आली. यावेळी मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दिलाच पाहिजे. मराठा आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे झगडता आहेत.