
पुणे :- पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर नवले पुलाजवळ केलेल्या जाळपोळ प्रकरणी 400 ते 500 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून गर्दी जमा केल्याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवले पुलावर मोठ्या संख्येनं मराठा आरक्षणासाठी आंदोलक जमले होते. त्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या प्रमाणावर रांगा लागल्या होत्या
पुण्यातील नवले पुलावर मराठे आक्रमक झाल्याचं बघायला मिळाले. अनेक मराठा कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. नवले पुलावर टायरची जाळपोळ करण्यात आली होती. रस्त्याच्या मधोमध टायर जाळल्याने नवले पुलाजवळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होते त्यामुळे अनेक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. पुण्यातील नवले पुलावर काल दुपारी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी काही तरुणांनी नवले पुलावर आंदोलन केले होते. या आंदोलनावेळी मुंबई बेंगलोर महामार्गावर टायर जाळण्यात आली होती. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात कलम 336 आणि कलम 441 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
पुण्यातील नवले पुलावर संपूर्ण रस्ता रोखण्यात आला आहे. रस्त्यावरील दोन्ही बाजूची वाहतूक टायर जाळून बंद करण्यात आली होती. यामुळं महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या प्रमाणावर रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी या ठिकाणी आंदोलकांची समजूत काढून तब्बल दोन ते अडीच तासांनतर वाहतूक सुरु करण्यात यश मिळवलं आहे. यावेळी मराठा आरक्षण आंदोलकांकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीला काही झाल्यास आंदोलन आक्रमकपणे करु असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
सरकारने लवकरात लवकर मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घ्यावा. त्यांनी आरक्षण द्यावं आणि राज्यातील मराठ्यांचा प्रश्न सोडवावा,. अनेक लोक आत्महत्या करत आहेत. अनेक ठिकाणी कायदा आणि व्यवस्थेचा मुद्दा निर्माण झाला आहे. राज्यातली ही परिस्थिती नियंत्रणाल आणायाची असेल आणि सगळं सुरळीत करायचं असेल तर त्यांनी थेट आरक्षण जाहीर करावं. नाही तर महाराष्ट्र असाच पेटत राहिल, असं मराठा कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.