
पुणे:-भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त मंगळवारी काँग्रेस भवन येथे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक रोहिणी गवाणकर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी देशातून भाजपला चले जाव म्हण्याची वेळ आली असल्याची टीका शिंदे यांनी केली आहे.यावेळी बोलताना अरविंद शिंदे म्हणाले की, 1942 च्या चले जाव च्या आंदोलनामध्ये मुंबई नंतर देशामधील महत्वाचे ठिकाण असलेले पुणे शहर जिथे हुतात्मा नारायण दाभाडे यांना इंग्रजांनी काँग्रेस भवनच्या आवारामध्ये गोळ्या घातल्या. याच पुणे शहराने देशाला दिशा देणारे विचारवंत नेतृत्व देणारे कर्तृत्वान नेते दिले. देशाचा तिरंगा झेंडा पहिल्यांदा याच 1942 च्या आंदोलनामध्ये अरुणा असफ अली यांनी फडकवला होता.देशाच्या स्वातंत्र्यामध्ये कसलाही आणि कोणताही भाग न घेता आज देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटणारे हर घर तिरंगा हे अभियान राबवित आहे परंतु ज्यांनी या तिरंगा झेंड्याला विरोध केला, ज्यांनी झेंडा जाळला आणि ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यानंतर 51 वर्ष देशाचा तिरंगा झेंडा फडकविला नाही ते आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त चमकोगिरी करीत आहेत. 1942 च्या चले जाव आंदोलनानंतर 1947 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी व क्रांतीकारकांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन हुतात्मे झाले.
यानंतर ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक रोहिणी गवाणकर यांचा सन्मान ज्येष्ठ नेते उल्हास पवार, अरविंद शिंदे, ॲड. अभय छाजेड यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना रोहिणी गवाणकर म्हणाल्या, भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये महिलांचे देखील मोठ्या प्रमाणावर योगदान होते. त्यामध्ये प्रामुख्याने अरूणा असफ अली या क्रांतिकारी विचारांच्या होत्या. 9 ऑगस्टला गवालिया टँक येथे त्यांनी अत्यंत क्रांतीकारी भूमिका बजावत देशाचा तिरंगा झेंडा फडकवून भूमिगत झाल्या. अशा अनेक महिला या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत होत्या.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर, कमल व्यवहारे, दिप्ती चवधरी, धनंजय दाभाडे, अजित दरेकर, लता राजगुरू, अविनाश बागवे, रफिक शेख, संगीता तिवारी, रजनी त्रिभुवन, ॲड. अनिल कांकरिया, भगवान धुमाळ, आबा जगताप, नितीन परतानी, भरत सुराणा, अविनाश गोतारणे, बाळासाहेब प्रताप, हरिदास अडसूळ, ॲड. विजय तिकोने, ॲड. अश्विनी गवारे, गौरव बोराडे, कान्होजी जेधे आदींसह काँग्रेस कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.